प्रिय पिल्लु,
तु पाठवलेलं पत्र काल माझ्या हाती लागलं.
मन खुप भावनांनी भरून आलं…
अनेक दिवसापासून मनात दाटून बसलेल्या संवेदना जागृत झाल्या…
शब्दाचं उद्रेक फुटलंय…
मी तसा लेखक नाहीये आणि उपदेशकही; मी स्वतंत्र विश्वाचा स्वाधीन प्राणी आहे. माझं दिशासुचक निसर्ग आणि मार्गदर्शक निसर्ग यांच्या दुहेरी गाठीतून निर्माण झालेलं भावी मार्ग…
व ज्या लोकांमुळे माझी जगण्याची उमेद आहे ते सर्व तुम्ही माय-बाप.
शाळा सोडून काही वर्ष उलटली आहे. बाहेरच जग हे राग, द्वेष, मत्सर, करुणा, सहानुभूती आणि ‘मी’पणा यांनी जखडलेलं असुन समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या मूल:ततत्वावर उभी आहे…
या सर्व गोष्टीचा तुझ्या आणि माझ्या वैयक्तिक जीवनाशी काहीही घेणं-देणं नाहीये, परंतु एकविसाव्या शतकाच शंक पुकारण्याअगोदार, तू-मी या विश्वाचं एक अंग, या समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपल्या जागाच रहस्य आपल्याला उमगण महत्वाचं ठरतं. तू उगवत्या राष्ट्राच भवितव्य आहेस म्हणून,तुला दीर्घपत्र लिहावं, असं मला आपल्या ‘सरकार’न सुचवलंय…!
पिल्लु, तु सध्या शाळेच्या चार भिंतीमध्ये सुखरूप आहेस. उद्या शाळेमधून बाहेर पडल्यावर तुला एकपात्री नाटक जगायचं. या जगासाठी आपण ‘कुटपुतली’आहोत. जगाला आपल्या सुख-दुःखशी काहीही देणं-घेणं नाहीये; हे वर्तमानाच कटुसत्य आहे. त्यांना फक्त ‘तुझा-माझा’ नाटक बघायचंय. म्हणून पिल्ल्या, तू स्वतः सुखी असल्यावर दुःखी माणसासमोर स्वतःच आनंद द्विगुणित करू नको आणि संकट कोसळल्यावर स्वतःच धैर्यवान जीवनपर्वत कोसळू देऊ नको रे. स्वतःच्या सुख-दुःखाचा तराजू स्वतःच्या हातात घेऊन पुढे चालत राहा…
कधी-कधी मला लोक सांगतात; ‘तात्या,तू खूप छान बोलतोस, वागतोस, तसा राहतोसही’. अश्या कोकीळ मंजुळीवर मला खूप हसू येतंय. पिल्ल्या, मी तर या निसर्गाचं Product आहे. मी फक्त अण्णांनी दाखवलेल्या पाऊलवाटेच रूपांतर चार पदरी रस्त्यात करतोय, यात नवीन असं काय? अण्णाला रस्त्यावर काटा दिसला तर ते बैलगाडीतून खाली उतरायचे अन काटा बाजूला काढायचे. त्यांच्या अशा अनेक गोष्टीबद्दल पूर्वी मला पेच पडायचा. शेतात काम करून त्यांचे पाय ‘खटारा’सारखे रट्ट झालेले होते. मुळात, ‘दुसऱ्यांना काटा टोचू नये’ अशा अनेक समाजसेवी भावनेचा जन्म त्यांच्यात कसा झाला? ‘याचा शोध घेताना मला त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेता आलं.
अरे पिल्ल्या, त्या व्यक्तिमत्वाच्या हृदयात ‘तु-मी’ नव्हतं तर आपल्या सारख्या प्रत्येक माणसाबद्दल सहानुभूती होती. ते रंग, जात, लिंग, धर्म यावरून भेदभाव करत नव्हते. त्यांच्यासाठी ‘तुम्ही जगासाठी कोण आहात? ‘हे महत्त्वाचं नव्हतं तर ‘पैसा’ सोडून तुमच्याकडे असलेल्यापैकी ‘जगासाठी काय-काय देऊ शकता?’ आणि यावरून ते व्यक्तीच अवलोकन करायचे. ते ज्ञानी लोकांना मन-सन्मान द्यायचे. त्यांनी अज्ञानी लोकांना एकत्रित करून ‘विद्या विनयेन शोभते’या अद्याक्षराद्वारे व्यवहरिक ज्ञान प्रचाराची मुहूर्त रोवली. हे सर्व सांगण्यास कारण कि, या सर्व नैतिक मूल्यांची ‘बीज’ अण्णामध्ये विद्यार्थी दशेत असतानाच रोवली गेली. हल्ली, मी पण त्यांचं अनुकरण करतोय. माझी इच्छा आहे कि, बाहेरच्या कपोलकल्पित जगामध्ये जगण्यासाठी अण्णांनी सांगीतलेलं ब्रम्हास्त्र तू बाल्यावस्थेत असतानीच तयार करून ठेव. कदाचित, तिसऱ्या महायुद्धाच्या वेळी जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हेच माणुसकीचे धडे तुझ्या कामी येईल. त्या युद्धमैदानावर तुझे ‘शब्दच’ अनेकांचं शिरच्छेद करतील.
विशेष म्हणजे, जेव्हा तू यश संपादन करशील, तेव्हा तुझ्या विजयाचे पताके अस्मानात फडकू दे व तुझे सुवर्ण पाय जमिनीवर असले तर अधिक उठून दिसतील यात शंका नाहीये…
या यशोगाथेच्या प्रवासात पिल्लू तुला अपयश आलं तर कधीच खचून बसू नको; कारण ज्या व्यक्तीचा तुझ्यावर विश्वास आहे त्यांना तुझ्या स्पष्टकरणाची गरज नसते आणि ज्यांना तुझ्यावर विश्वास नाहीये, त्या लोकांना तुझ्या स्पष्टकरणासाठी काहीही किंमत नसते. त्यामुळे या बहुरूपी दुनियेत तुला स्वतःच दिवा स्वतःच पेटवायचं आणि त्या दिव्याच्या प्रकाशात स्वतःच जीवन प्रकाशमय करून जगामध्ये पसरलेल्या अंधाराला नष्ट कारण्यासाठी तुलाही हातभार लावायचं, हे विसरू नकोस…!!
पिल्ल्या, बाहेरची चंगळवादी दुनिया फार मतलबी आहे रे! या दुनियेमध्ये जोपर्यंत तू चमत्कार करणार नाहीस तोपर्यंत तुला कोणीही नमस्कार करणार नाही. ‘शिक्षण’ हे एकमेव साधन आहे, जे पैश्याला कमी अन् माणुसकीला धार-धार करत. आपल्या भाऊने शाळेमधून बाहेर पडल्यावर पैसे थोडेच कमविले रे; परंतु त्यांनी माणसाची शिदोरी बांधलीय. ती अजूनही तशीच आहे… तीच त्यांची खरी संपत्ती. खरं सांगतो, तुझ्यासाठी तुझे classmates, seniors आणि juniors हे कोहिनूरच्या हिऱ्याहूनही अधिक मौल्यवान आहेत. पैसा काळाची गरज आहे आणि पुढे भविष्यात तुला पैश्याची गरजही भासणार आहे… बेटा, तू पैसा जरूर कमव रे पण पैसे कमवितानी तुझ्यात असलेली मानवतेची आग कदापि विझू देऊ नको… ती ज्वलंत आग पुढे कमी येणाय आहे. एके वेळी पैसे नसले तरीही चालेल पण स्वाभिमानाने उंचावलेली तुझी मान कधीच खाली येऊ देऊ नको. शाळेने तुझ्यात निर्माण केलेल्या स्वाभिमानाची तुलना पैशासोबत करून स्वतःच आयुष्य उद्धवस्त करू नको…
या लोकतांत्रिक देशामध्ये प्रत्येक क्षणाला संविधान तुझ्या डोक्यात असणं गरजेच आहे, म्हणून उद्या लिब्ररीमध्ये जा आणि भारताचा संविधान वाच. त्याचं आदर करणं, त्याची मूल्य जपणं हे तुझं उत्तरदायित्व आहे. जगात असत्याच्या मार्गाने काम करणाऱ्या आणि चालविणाऱ्या लोकांना तुझ्या सत्यवादी संविधानी चाबुकाची गरज हाय रं! त्यामुळे तू आतापासूनच वेळेचं नियोजन करायचं शिक. ‘गेलेली वेळ परत येत नाही’ याचा अर्थ ‘त्या वेळेत खर्च झालेलं आयुष्य परत येणार नाही’ असाही होतो. घड्याळाचा टिक्-टिक् करणारा काटा ‘आयुष्य दिवसेंदिवस उलटून जातंय’, हा संकेत देत असतो.
पिल्लु, मृत्यू अटळ आहे.
प्रत्येक क्षण हा मृत्यूच्या द्वारी घेऊन जाणारा आहे.सकाळच्या वेळी ‘राम-राम’ करणारी मंडळी ‘राम नाम सत्य है।’ याची संबोधनात्मक सूचना देत असतात.
एके दिवशी आपण सर्व मृत्यूच्या चक्रव्युव्हामध्ये अडकून मातीसामान होणार आहोत. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे. भूतकाळाकडे वळून पाहिल्यावर ‘आपण जीवन जगलो आहोत’ असे उद्गार इतिहासाने काढावे म्हणून भविष्याची रचना नवोदयमध्ये असतानाच करून ठेव. मुळात जीवन हे सुंदर आहे की वाईट हे matter करत नाही तर तुझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन matter करतो, हे कदापि विसरू नको. निसर्गाने सर्व लोकांना सारखं आयुष्य दिलंय. आयुष्याच राख करायचं की सुवर्ण अक्षराने इतिहासाच्या पानोपानी अजरामर होऊन जायचं, हे आपल्या हातात असतं रे.
तुझ्यावर कधी वाईट अवस्था येईल त्याच बाऊ करणार नाहीस याची मला हमी दे. चिमण्या, तुझ्या वाईट अवस्थेहुनही तुझा संघर्ष मोठा असला पाहिजे. ‘परिस्थितीला संधी समजून, तू त्याला तुझी ताकत कस बनवलसं?’ हे जाणून घेण्यासाठी भविष्य तुझी वाट पाहतोय. त्याला तू निराश करू नकोस…
हल्ली, बाहेर प्रेमाचं वादळ सुरु आहे. प्रेम होणं किंवा प्रेम करणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. जेथे प्रेमाचा अंत होतो तेथे द्वेषाच राज्य उदयास येतात, या गोष्टी तू समजून घे. कथा-कादंबऱ्यामध्ये वाचलेलं प्रेम, चित्रपट-मालिकेमध्ये पाहिलेलं प्रेम, बाहेरच्या दुनियेमधलं ऐकलेलं प्रेम हे क्षणभंगुर आहे. या भ्रमाच्या दुनियेत जगू नकोस. तू प्रेम जरूर कर पण त्या प्रेमाला स्वार्थीपणाची झळक शेवटच्या श्वासापर्यंत लागणार नाही, याबद्दल तू सतत दक्ष राहा…
आपल्याला किड्या-मकोड्यासारखं जीवन जगायचं नाही रे पिल्ल्या! त्यामुळे पुस्तकासोबत मैत्री कर, अफाट ज्ञानसागरावर स्वार हो. आपल्या आई-वडिलांनी भोगलेल्या परिस्थिचा उद्धार आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी शाळेच्या चार भिंतीमध्येच स्वतःच व्यक्तिमत्व निर्माण करावा लागेल…
पिल्लु, भविष्यात तुझ्याकडे माझ्याहूनही जास्त ज्ञान असेल यात शंका नाही, पण तूझ ते अफाट ज्ञान ज्या वेळी तू मातृभूमीच्या विनाशाऐवजी विकासासाठी वापरशील त्यावर तू एक सच्चा ‘माणूस’ आहेस याच सार्थक होईल…
मी मागे एके ठिकाणी वाचलं होतं-
“When you work for success, you become Ideal; but when you work for satisfaction, you become Legend…!!”
असो.
संपूर्ण विश्वासाठी तू-मी शून्य आहोत. मला माझ्या भविष्याची गुरुकिल्ली मिळालीय. आता, तुलाच तुझं विश्व शून्यातून निर्माण करायचयं. हे निर्माण करताना तू दुसऱ्याच्या पायावर कुऱ्हाड पडणार नाही, याबद्दल सचेत रहा आणि ज्यावेळेस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पडेल तेव्हा माझ्या ‘सरकार’चं वाक्य ध्यानात ठेव-
“When one end of the pencil breaks then keep in mind that the other end is just waiting for you to create a beautiful world…”
पिल्ल्या, आपल्याला ‘नितळ पाण्यासारखं’ आयुष्य जगायचं. भविष्यात मला तुझा हात हवाय. ज्यावेळी तू ‘राजयोग’ मुकुट परिधान करण्यासाठी सक्षम असशील त्यावेळी मी अख्या जगभर तुझे यशोद्वगार गाणार आहे. हे माझं secret प्लॅन आहे. तू कोणाला सांगू नको, बरं का…!!
या सर्व गोष्टी केंद्रस्थानी ठेवून ‘एक सामर्थ्यवान व्यक्तित्वा’पासून तू कधीच विभक्त हिणार नाहीस, याच प्रतित्तर मला हवंय! पत्रावर माझ्या संपूर्ण पत्त्याची गरज पडणार नाही. फक्त ‘राजयोग’ टाकलस, तरीही पुरेस होईल… माझ्या लाडक्या ‘पिल्लू’च पत्र माझ्याकडे पोहचून जाईल…!!
तुझाच काकोबा
✍️राजयोग
Leave a Reply
You must be logged in to post a comment.